Friday 1 February 2013

हिंदू आतंकवाद

रविवारचे भाष्य दि. ३ फेब्रुवारी २०१३ करिता

हिंदू आतंकवाद’, ‘भगवा आतंकवादअसे बेजबाबदार शब्द वापरल्याबद्दल गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निषेधाचा लेख मी गेल्या रविवारच्या भाष्यातच लिहिला होता. तो विषय पुन: हाताळण्याचे तसे प्रयोजन नव्हते. पण, तो लेख लिहिल्यानंतर याच विषयावर दोन अत्यंत सुंदर लेख माझ्या वाचनात आले. त्या लेखांचा परिचय माझ्या वाचकांनाही व्हावा, या हेतूने मी त्या लेखाचा स्वैर अनुवाद येथे प्रस्तुत करीत आहे.

गुरुमूर्तींचा लेख
पहिला लेख आहे एस. गुरुमूर्ती यांचा. तो चेन्नईवरून प्रकाशित होणार्‍या न्यू इंडियन एक्सप्रेसया दैनिकाच्या २४ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. विषय मुख्यत: भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणार्‍या समझौता एक्सप्रेसया गाडीवर, भारतातील पानिपत येथे जो बॉम्ब फेकण्यात आला आणि ज्यासाठी बर्‍याच उशिराने सरकारी तपास यंत्रणेने तथाकथित हिंदू आतंकवाद्यांची धरपकड केली, त्या संबंधी आहे. तो असा-

दाऊद इब्राहिमची मदत
‘‘२० जानेवारी २०१३ ला, जयपूर येथील कॉंग्रेसच्या तथाकथित चिंतन शिबिरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समझौता एक्सप्रेस, मक्का मशीद आणि मालेगाव येथील बॉम्बस्फोटासाठी रा. स्व. संघ आणि भाजपा यांना जबाबदार ठरविले होते. शिंदे यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी लष्कर-ए-तोयबाचे नेते हफीज सईद यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हा सईद यांच्या या मागणीसाठी शिंदे हे साक्षीदार ठरतात. आता आपण या बॉम्बस्फोटाच्या पुराव्यांचा विचार करू.
‘‘राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने २९ जून २००९ ला पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे की, ‘२००७ च्या फेब्रुवारी महिन्यात समझौता एक्सप्रेसवर जो बॉम्बहल्ला झाला त्यासाठी लष्कर-ए-तोयबाचा मुख्य समन्वयक कासमानी अरिफ हा जबाबदार आहे.या कासमानीला दाऊद इब्राहिमने पैसा पुरविला होता. दाऊदने अल् कायदाया अतिरेकी संघटनेलाही पैशाची मदत केली होती. या मदतीच्या मोबदल्यात समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्यासाठी अल् कायदाने मनुष्यबळ पुरविले होते. सुरक्षा समितीचा हा ठराव राष्ट्र संघाच्या साईटवर उपलब्ध आहे. दोन दिवसांनंतर म्हणजे दिनांक १ जुलै २००९ ला अमेरिकेच्या (युएसए) कोषागार खात्याने (ट्रेझरी डिपार्टमेंट) एका जाहीर पत्रकात म्हटले की, अरिफ कासमानीने बॉम्बस्फोटासाठी लष्कर-ए-तोयबाशी सहकार्य केले. अमेरिकेने अरिफ कासमानीसहित एकूण चार पाकिस्तानी नागरिकांची नावेही जाहीर केलीत. अमेरिकन सरकारच्या या आदेशाचा क्रमांक आहे १३२२४ आणि तोही सरकारी साईटवर उपलब्ध आहे.

पाकिस्तानची कबुली
‘‘राष्ट्र संघ आणि अमेरिका यांनी लष्कर-ए-तोयबा आणि कासमानी यांच्याविरुद्ध कारवाई घोषित केल्यानंतर, सहा महिन्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी, पाकिस्तानातील आतंकवादी, समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बस्फोटात सहभागी होते, हे मान्य केले. पण त्याला एक परन्तुक जोडले. ते असे की, ले. क. पुरोहित याने पाकिस्तानात राहणार्‍या इस्लामी आतंकवाद्यांना, यासाठी सुपारी दिली होती. (संदर्भ- इंडिया टुडेऑनलाईन, २४-०१-२०१०)
‘‘राष्ट्र संघ किंवा अमेरिका किंवा पाकिस्तानचे गृहमंत्री यांची बात सोडा. पण अमेरिकेत या प्रकरणाचा एका वेगळ्या यंत्रणेने जो तपास केला, त्यातून आणखी माहिती पुढे आली. सुमारे १० महिन्यांनंतर सेबास्टियन रोटेल्ला या शोधपत्रकाराने आपल्या अहवालात म्हटले आहे की, समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बहल्ल्यात डेव्हिड कोलमन हेडली याचाही हात होता. हे त्याची तिसरी पत्नी फैजा आऊतल्लाह हिनेच आपल्या कबुलीजबाबात सांगितले आहे. रोटेल्लाच्या अहवालाचे शीर्षक आहे, ‘२००८ मधील मुंबईतील बॉम्बस्फोटासंबंधी अमेरिकी सरकारी यंत्रणांना सावध करण्यात आले होते.रोटेल्ला पुढे सांगतात की, ‘आपणांस या हल्लाप्रकरणी गुंतविण्यात आले होते, असे फैजाने म्हटले आहे’ (वॉशिंग्टन पोस्ट- ५-११-२०१०). २००८ च्या एप्रिल महिन्यात लिहिलेल्या आपल्या तपासणीच्या पुढील भागात रोटेल्ला लिहितात की, ‘फैजा, इस्लामाबाद येथील (अमेरिकन) दूतावासात गेली होती आणि २००८ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट होतील, अशी सूचनाही तिने दिली होती.

सीमीचा सहभाग
‘‘इ. स. २००७ मध्ये, समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्याची चौकशी सुरू होत असतानाच, या हल्ल्यात सीमी’ (स्टुडण्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या संस्थेचाही सहभाग होता, असे पुरावे प्राप्त झाले आहेत. इंडिया टुडेच्या १९-०९-२००८ च्या अंकातील बातमीचे शीर्षक होते मुंबई आगगाडी स्फोटात आणि समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात : नागोरी’. त्या बातमीत लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तान यांच्या सहभागाचा सारा तपशील दिला आहे. सीमीच्या नेत्यांची जी नार्को चाचणी करण्यात आली, त्यावरून हे स्पष्ट झाले होते. ही नार्को चाचणी, ‘इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सीमीचे महासचिव सफदर नागोरी, त्याचा भाऊ कमरुद्दीन नागोरी आणि अमील परवेज यांच्या नार्को चाचण्या बंगलोर येथे एप्रिल २००७ मध्ये करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचे निष्कर्ष इंडिया टुडेकडे उपलब्ध आहेत. त्यावरून स्पष्ट होते की, भारतातील सीमीच्या कार्यकर्त्यांनी, सीमेपलीकडील पाकिस्तान्यांच्या साहाय्याने, हे बॉम्बस्फोट घडविले होते. एहतेशाम आणि नासीर ही त्या सीमीच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत कमरुद्दीन नागोरीही होता. पाकिस्तान्यांनी, सूटकेसचे वेष्टन इंदूरच्या कटारिया मार्केटमधून खरेदी केले होते. या प्रकरणाच्या चौकशीत हे स्पष्ट झाले की, त्या सूटकेसमध्ये पाच बॉम्ब ठेवले होते आणि टायमर स्विच्ने स्फोट घडवून आणले होते.

खोटारडे एटीएस
‘‘हे पुरावे समोर असताना महाराष्ट्राचे पोलिस खाते, या दिशेने पुढे का सरकले नाहीत, असा प्रश्‍न स्वाभाविकच उत्पन्न होतो. असे दिसून येते की, महाराष्ट्र पोलिस खात्यातील काहींना समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बहल्ल्याचे प्रकरण कसेही करून मालेगाव बॉम्बस्फोटाशी जोडायचे होते. महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस), आपल्या वकिलाच्या मार्फत, विशेष न्यायाधीशाला सांगितले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यानेच समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स पुरविले होते. परंतु नॅशनल सेक्युरिटी गार्डया केंद्र सरकारच्या यंत्रणेने सांगितले की, समझौता एक्सप्रेस हल्ल्यात आरडीएक्सचा वापर करण्यात आला नव्हता. पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर या रासायनिक द्रव्यांचा उपयोग करण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनीही या विधानाची पुष्टी केली होती. मजेची गोष्ट ही की, त्या दिवशी म्हणजे १७-११-२००८ ला दहशतवादविरोधी पथकाच्या वकिलानेही आपले पूर्वीचे बयाण वापस घेतले. परंतु जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले होते. पाकिस्तानने जाहीर केले की, सचिव पातळीवरील बैठकीच्या वेळी, समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्ल्यातील कर्नल पुरोहिताच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल. शेवटी, २० जानेवारी २००९ ला दहशतवादविरोधी पथकानेही अधिकृत रीत्या मान्य केले की, समझौता एक्सप्रेसवरील हल्ल्यासाठी कर्नल पुरोहित याने आडीएक्स पुरविले नव्हते. अशा प्रकारे समझौता एक्सप्रेसवरील बॉम्बहल्ल्याचे केंद्र, लष्कर-ए-तोयबा आणि सीमीयांच्याकडून कर्नल पुरोहित आणि त्याद्वारे भगव्या रंगाकडे वळविण्यात आले. महाराष्ट्र पोलिस यंत्रणेवर दाऊद इब्राहिमचा प्रभाव आहे की काय, याची आता चौकशी झाली पाहिजे.’’
प्रश्‍न असा की, खरे कोण सांगत आहे? राष्ट्र संघ, अमेरिका, की शिंदे साहेब? शिंदे साहेबांकडून या प्रश्‍नाच्या उत्तराची अपेक्षा आहे.
***           ***           ***

फ्रॅन्कॉई ग्वाटियेचा लेख
दुसरा लेख आहे विदेशी पत्रकार फ्रॅन्कॉई ग्वाटिये (Francois Gautier) यांचा. त्यांच्या लेखाचे शीर्षक आहे ‘‘हिंदू आतंकवाद नावाची वस्तू आहे काय?’’ (Is There Such a Thing As Hindu Terrorism). त्यांच्या लेखालाही शिंदे यांच्या वक्तव्याचाच संदर्भ आहे. ते लिहितात-
‘‘मी विदेशी वार्ताहरांमधला अपवादभूत वार्ताहर आहे. माझे हिंदूंवर प्रेम आहे. मी जन्माने फ्रेंच आहे. कॅथॉलिक आहे. म्हणजे अहिंदू आहे. माझ्या स्वत:च्या मतांबद्दल मलाच श्रेय दिले पाहिजे. कारण, ती मते मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेली नाहीत. माझ्या शिक्षणातून किंवा वंशपरंपरेनेही ती आलेली नाहीत. १९८० पासून ला जर्नल दि जिनेव्हाआणि ला फिगॅरोया वृत्तपत्रांसाठी, दक्षिण आशियातील घडामोडींचा वेध घेताना मला जे दिसले आणि जाणवले, त्यावरून ही माझी मते बनलेली आहेत. हळूहळू मला जाणवले की, या देशाचे वैशिष्ट्य हिंदू जीवनमूल्यांमध्ये (ethos) आणि हिंदुत्वाला आधारभूत असलेल्या सच्च्या आध्यात्मिकतेत आहे.

हिंदूंचे वैशिष्ट्य
‘‘लक्षावधी ग्रामीणांमध्ये ही साधी, अंगभूत आध्यात्मिकता मला जाणवली. ती तुमच्या विविधतेचा स्वीकार करते. मग तुम्ही ख्रिस्ती असा की मुसलमान असा, अरब असा की ज्यू असा, फ्रेंच असा की चिनी असा. या हिंदुत्वामुळेच, भारतीय ख्रिश्‍चन फ्रेंच ख्रिश्‍चनापेक्षा वेगळा असतो किंवा भारतीय मुसलमान, सौदी मुसलमानापासून अलग भासतो. मला हेही दिसले की, हिंदूंची अशी श्रद्धा आहे की, ईश्‍वर वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळी नावे धारण करू शकतो. या धारणेमुळेच, स्वदेशात छळ झाल्यामुळे ज्यांना परागंदा व्हावे लागले, असे सीरियन ख्रिश्‍चन, पारशी व ज्यू यांना पूर्वी आणि आता अलीकडे तिबेटी लोकांना हिंदूंनी आश्रय दिलेला आहे. भारताने म्हणजेच हिंदूंनी, निदान गेल्या साडेतीन हजार वर्षांमध्ये, कोणत्याही देशावर लष्करी हल्ला केला नाही; तसेच, बळाने किंवा लालचीने आपला धर्म कुणावरही लादला नाही.

वेदनादायी तुलना
‘‘असे असतानाही निरपराधी लोकांची कत्तल करणार्‍या सीमीसारख्या संस्थांशी, रागाच्या भरात क्वचित्प्रसंगी ख्रिस्ती चर्चेस जाळणार्‍या हिंदूंची तुलना केली जाते, तेव्हा मला दु:ख होते. रागावेशात चर्चवर हल्ले झाले, पण हत्या झाली नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
‘‘बाबरी मशिदीचा ध्वंस ही कितीही निंदनीय बाब असली, तरी त्या प्रकरणात, कुणाही मुसलमानाची हत्या झाली नव्हती. याची, बाबरीच्या ध्वंसाचा सूड घेण्यासाठी १९९३ साली मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्याच्याशी जरा तुलना करा. मुंबईतील बॉम्बस्फोटात शेकडोंना मरण आले होते.

हिंदू हेच आघातलक्ष्य
‘‘मला या ठिकाणी, त्या तथाकथित हिंदू दहशतवादासंबंधी सांगितलेच पाहिजे. अरबस्थानातून आलेल्या पहिल्या आक्रमणापासून हिंदू हेच आघातलक्ष्य राहिलेले आहेत. तैमूरलंगाने इ. स. १३९९ मध्ये, एका दिवसात, एक लाख हिंदूंना ठार केले होते. पोर्तुगीजांनी इन्क्विझिशनच्या नावाखाली, गोव्यात, शेकडो ब्राह्मणांना सुळावर चढविले होते. आजही हिंदूंचा छळवाद संपलेला नाही. काश्मिरातील दहा लाख हिंदूंना तो भोगावा लागला आहे. सध्या फक्त शेकड्यांच्या संख्येत थोडे हिंदू तेथे राहत आहेत. बाकीच्यांनी, दहशतीपासून आपला बचाव करण्यासाठी पलायन केले आहे. केवळ गेल्या चार वर्षांच्या अल्प कालावधीत, संपूर्ण भारतात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटात शेकडो निरपराध हिंदू मारले गेले आहेत.

भेदभावाची वागणूक
‘‘या देशात हिंदूंची बहुसंख्या आहे. पण त्यांची थट्टा केली जाते. त्यांना मूलभूत सोयीही प्राप्त होत नाहीत. अमरनाथ यात्रेचे उदाहरण माझ्यासमोर आहे. सरकार हिंदूंचे आहे, तरी हे घडत आहे. आणि हज यात्रेला मात्र पुरस्कृत केले जात असते.
‘‘हिंदू वनवासी बंधू आणि भगिनी यांना आर्थिक लालचीने किंवा रचलेल्या आर्थिक सापळ्यांनी ख्रिस्ती बनविले जाते. त्यांच्यातील एक ८४ वर्षे वयाचा साधू आणि एक साध्वी यांचा निर्घृण खून केला जातो. कधी कधी मात्र, वर्षानुवर्षे शेळ्यामेंढ्याप्रमाणे कत्तल सहन करणारे, हिंदू, ज्यांना महात्मा गांधींनी भित्रे म्हणून संबोधिले होते, वेगाने उसळी घेतात. असेच गुजरातेत घडले. तसेच जम्मूत आणि कंधामल, मंगलोर, मालेगाव किंवा अजमीरमध्ये घडले.

आकडे सांगा
‘‘इतरत्रही अशा घटना घडू शकतात. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, राजकीय नेतृत्वाने घडवून आणलेल्या या घटना नाहीत. तो उत्स्फूर्त उद्रेक असतो. या जगातील लोकसंख्येत १०० कोटी हिंदू आहेत. जगातील कायद्याचे पालन करणार्‍या लोकांमध्ये आणि उद्योगात यशस्वी ठरलेल्या लोकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना आपण आतंकवादी म्हणणार? १९४७ पासून मुसलमानांकडून किती हिंदू मारले गेले व हिंदूंकडून किती मुसलमान मारले गेले, याची मोजदाद इतर कुणी करो वा न करो निदान भाजपाने ती अवश्य करावी. ते आकडेच सत्य काय ते सांगतील.’’

सुशीलकुमारजी, आहे काय तुमच्याजवळ याला उत्तर? बहुतेक नसावेच; आणि असले तरी ते देणारही नाहीत. कारण, ते हिंदू आहेत ना!


-मा. गो. वैद्य
नागपूर
babujivaidya@gmail.com
०१-०२-२०१३

दोन्ही लेख मुळातून वाचण्यासाठी लिंक:

No comments:

Post a Comment