Saturday 13 December 2014

‘घरवापसी’चा विनाकारण गदारोळ

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात 57 मुसलमान कुटुंबांनी आपल्या मूळ हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला. या घटनेवर संसदेत तसेच प्रसिद्धी माध्यमांत उगाचच वाद उभा करण्यात आला आहे. अनेकांनी या प्रक्रियेला धर्मांतरण, धर्म परिवर्तन आणि इंग्रजीत कन्व्हर्शनम्हटले. परंतु हे धर्मपरिवर्तन नाही. ही घटना म्हणजे आपल्याच घरी म्हणजेच आपल्या समाजात पुनरागमन आहे. ही घरवापसीआहे. उलट त्यांचे धर्मपरिवर्तन याआधीच झाले होते.
इस्लामचा प्रसार भारतात म्हणा की सार्‍या दुनियेत म्हणा, कुठल्या प्रकाराने झाला हे सर्वविदित आहे. इस्लामचा अर्थ शांतीआहे, असे सांगण्यात येते. परंतु कुठेही इस्लामचा प्रसार शांतीच्या मार्गाने झालेला नाही. बहुतेक ठिकाणी तर तो तलवारीच्या धाकावर झालेला आहे.
आपण कधी विचार केला का, कीपारशी समाजाला आपली जन्मभूमी सोडून का पळावे लागले? काश्मीरच्या खोर्‍यातील 50 लाख मुसलमानांमध्ये 4 लाख हिंदू पंडित का नाही राहू शकले? या सार्‍यांनी जर इस्लाम धर्म स्वीकारला असता तर ते वाचले असते. हा इतिहास आहे. जसा प्राचीन तसा अर्वाचीन देखील.
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, आगर्‍यात ज्या मुस्लिम कुटुंबांनी घरवापसी केली, त्यांचे धर्मपरिवर्तन आधीच झाले होते. कुठल्या प्रकारे झाले होते याची आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ही मंडळी आधी हिंदूच होती. भारतात आज मुसलमानांची लोकसंख्या 15 कोटी आहे. त्यातील 1 टक्का देखील बाहेरून म्हणजे अरबस्थानातून किंवा तुर्कस्थानातून किंवा इराण मधून आले नसतील. येथील जे हिंदू होते त्यातीलच 15 कोटी मुसलमान झालेत. त्यापैकी काही पुन्हा आपल्या मूळ धर्मात म्हणजे हिंदू धर्मात परत येत असतील तर याचा सर्वांना आणि कमीतकमी हिंदूंना तरी आनंदच व्हायला हवा; त्यावर टीका करणे, त्याची निंदा करणे अर्थहीन आहे.
हिंदूंनी कधीही बळजबरीने धर्मपरिवर्तन केलेले नाही. हिंदूंचा हा रिवाज असता तर इराणमधून पळून आलेले पारशी हिंदुस्थानात आपला धर्म आणि उपासना टिकवू शकले नसते. एक हजाराहून अधिक वर्षे झालीत परंतु पारशी आपल्या धर्म आणि उपासनेसह आजही विद्यमान आहेत. दीड हजाराहून अधिक वर्षे आपल्या मातृभूमीतून परागंदा झालेल्या ज्यू लोकांना ख्रिश्‍चन देशांत अनेक अपमान व यातना सहन कराव्या लागल्या. परंतु ते भारतात मात्र सर्व दृष्टीने सुरक्षित राहिले. याचे कारण भारतात हिंदू बहुसंख्येत होते आणि आहेत, हे आहे.
हिंदूंची एक मौलिक मान्यता आहे की, परमात्मा एक असला तरी त्याची अनेक नावे असू शकतात. त्याच्या उपासनेचे अनेक मार्ग किंवा प्रकार असू शकतात. विविधतेचा सन्मान (Appreciation of plurality) करणे ही हिंदू संस्कृतीची अविभाज्य धारणा आहे. आणि म्हणून बळजबरीने किंवा आमिष दाखवून आपली संख्या वाढविण्यात हिंदूंना कधीही रुची नव्हती, ना आज आहे.
होय, एक परिवर्तन मात्र अवश्य झाले आहे. आधी काही रूढींमुळे हिंदू समाजातून बाहेर जाण्याचाच फक्त मार्ग खुला होता. ज्याने हिंदू धर्माचा त्याग केला तो नंतर त्याची इच्छा असली तरीही हिंदू धर्मात परतू शकत नसे. आता हिंदू समाजाने आपले दरवाजे उघडले आहेत. जो गेला तो परत येऊ शकतो. पूर्वी आर्य समाजाने हे कार्य केले आहे. आज ज्यांना सनातनी म्हणण्यात येते, त्यांनी देखील स्वत:त बदल केला आहे आणि जे दूर गेलेत त्यांना परत येण्याची सोय उपलब्ध केली आहे.
गोष्ट 1964 किंवा 65 सालची असावी. सर्व शंकराचार्य, धर्माचार्य, महंत, पीठाधीश आणि साधु-संत कर्नाटकातील उडुपी येथे एकत्र आले होते आणि त्यांनी जाहीर केले की जे बाहेर गेले आहेत ते परत येऊ शकतात. त्यांची घोषणा होती-
हिन्दव: सोदरा: सर्वे
न हिन्दु: पतितो भवेत्|
भारत हिंदुबहुल देश आहे म्हणून येथील राज्य पंथनिरपेक्ष (Secular) आहे. पाकिस्तान, बांगला देश, इराण, इराक, सौदी अरब, लीबिया येथील राज्य सेक्युलर कां नाही, याचा मुक्त मनाने विचार केला पाहिजे. म्हणून हिंदू समाजातून कुठल्याही कारणामुळे का होईना जे बाहेर गेलेत, ते जर आपल्या समाजात परतू इच्छितात तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे. घरवापसीचे स्वागत केले पाहिजे, निंदा तर अजीबात करण्यात येऊ नये.

-मा. गो. वैद्य

11 डिसेंबर 2014

1 comment:

  1. Let's assume, entire 1.25 billion population of Bharat accept Hindu/Sanatan as their religion, then what's next? What are we going to achieve? I'd seriously like to understand the road-map for our generation or the thought-process behind this Ghar-wapasi.

    ReplyDelete